पंतप्रधानांसाठी जाहीर पत्र (रक्षकच बनले भक्षक)
Posted by संदीप नारायण शेळके on January 24, 2013
Read in English
प्रती,
कॉंग्रेस प्रणीत केंद्र सरकार,
भारत.
मा. पंतप्रधान महोदय,
गेल्या काही वर्षांमधील घटना आणि त्यावर तुमच्या सरकारच्या आणि परिणामी तुमच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर असे दिसते कि तुम्हाला तुमच्या कामाचा विसर पडला आहे. त्या मुलभूत कामांची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी, हा खटाटोप.
तुम्हाला ठरवून दिलेली मुख्य कामे:
१. नागरिकांचे व्यक्ती, संचार आणि व्यवसाय स्वातंत्र्य अबाधित राखणे
२. सर्वांना समान न्याय मिळवून देणे
३. अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून जीवन आणि मालमत्तेची सुरक्षा करणे
४. समान संधी (त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास) मिळवून देणे
ह्यासोबतच, प्रत्येक पै-न-पै चा हिशेब देणे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.
वर ठरवून दिलेली कामे इमाने-इतबारे करण्याची शपथ घेतलेली असताना, खेदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही ह्यातील एकही गोष्ट देऊ/पाळू शकला नाहीत. ह्याची नमुनादाखल खाली काही उदाहरणे दिली आहेत. क्रमशः
१. मागे एका व्यंग चित्रकाराने चित्र काढले म्हणून तुमच्याच कुठल्यातरी नियमानुसार त्याला अटक केली, अटक करणाऱ्यांवर काहीच कारवाई नाही.
२. महाराष्ट्र आणि आसाम मध्ये दुसऱ्या राज्यांमधून आलेल्या नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेचे नुकसान झाले, कोणावर काहीच कारवाई नाही.
३. समान न्याय दूरच राहिला परंतु देशाची संपत्ती लुटून भ्रष्टाचार करणाऱ्या तुमच्याच सहकाऱ्यांना साधे निलंबित सुद्धा केले नाही.
४. राजधानी सहित संपूर्ण देशभरात महिलांवरील अत्याचार, लुटमार आदींची परिसीमा झालेली असताना तुमच्याकडून काय पाऊल उचलले गेले? काहीच नाही याउलट, नको त्या विषयांवरून तुमच्या सहकाऱ्यांनी प्रसार माध्यमांमधून गदारोळ उठवून देशात अशांतंता निर्माण करण्याचे प्रयत्न केले.
५. सीमारेषा ओलांडून येउन काही दहशतवाद्यांनी देशाला वेठीस धरले, तुम्ही काय केले? तर त्या देशासोबत क्रिकेटच्या माध्यमातून चर्चा वाढवली.
६. एवढेच नाही तर त्या देशाने आपल्या सैनिकांना शांतंता रेषेजवळ अमानवीय रीतीने छळ करून मारले आणि एका सैनिकाचे शीर पळविले. तुमच्या सहकाऱ्यांनी देशप्रेमाच्या नावाखाली अतिरेक करू नका असे आम्हालाच सुनावले. एवढ्यावर न थांबता देशाला विरोधी पक्षापासून जास्त धोका आहे असे जाहीर प्रकटन करायला सुरुवात केली.
७. अशा परिस्थितीमध्ये गृहमंत्र्यांनी देशाची चिंता करायची सोडून बेछूट आणि बिन-बुडाचे युक्तिवाद सुरु केले कि ‘हिंदू दहशतवाद’ फोफावला आहे. खरच का? तसे असते तर ८०% हिंदू जनतेने जगभर हाहाकार माजवला असता. जगातील सर्वात सृजनशील आणि सहिष्णू समाजालाच दुषणे लावायला सुरुवात केली.
८. आम्हाला ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना काही शहरांमधून पाण्याचा भल्या मोठ्या प्रमाणावर अपव्यय होताना दिसतो. तुम्ही काय पाऊले उचलली?
९. सर्वसाधारण गरीब जनतेला दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. तुम्ही काय केले? प्रत्येक वेळी एक नवीन योजना काढून भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले. आणि नंतर रीतसरपणे विसरून जाता किंवा दुर्लक्ष करता.
१०. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, हिशोब मागितला तर तुम्ही आम्हाला अटक करता नाही तर आयकर विभागाकडून तपासाचा ससेमिरा नाहक मागे लावता. असे डूख धरून सूड बुद्धीने काम करायला आणि भाऊ-बंधकी निभवायला तुमची निवड केलीय का?
११. एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या विरोधी बाजू घेतली; म्हणून, तुमच्याच कोण्या एका सहकाऱ्याने पोलिसांकडून त्या वकिलाच्या भावाला शनिवारी मध्यरात्री अटक केली आणि तुरुंगात बेदम मारहाण केली.
एवढे सगळे झाल्यावर, इतक्या सगळ्या चुका केल्यावर तुम्हाला हे काम करण्याची अजूनही संधी का द्यावी? संविधान आणि नागरिकाच्या सार्वभौमत्त्वाचा अनादर केला म्हणून तुमच्यावर अविश्वास ठराव का ठेवू नये?
आणि हो हे पत्र वाचल्यावर हा कोण, मला माझे काम सांगणारा? असा विचार चुकुनही करू नका कारण, मी, तुमचा मालक, ह्या देशाचा सार्वभौम नागरिक आहे.
जय भारत!
- एक जागसुक नागरिक.
18.649240
73.765628
Like this:
Like Loading...
This entry was posted on January 24, 2013 at 9:38 am and is filed under Bharat, Marathi, Politics, Thoughts.
Tagged: Letter to prime minister, marathi, reminder of importance of republic of Bharat, Sovereign citizen. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed.
You can leave a response, or trackback from your own site.