काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू नका, ते देश बरबाद करतील
Posted by संदीप नारायण शेळके on April 22, 2012
Read in English. (Don’t vote for Congress and NCP, they will ruin our nation).
हे वृत्त विदर्भ न्यूज वरून जशाच्या तसे तुमच्या समक्ष प्रकाशित करीत आहे. मूळ वृत्तासाठी इथे (एकाच रात्रीत तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या) वाचा.
कापूस उत्पादक शेतक-यांना राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई चार महिन्यांनंतरही न मिळाल्याने हताश झालेल्या यवतमाळमधील दोन आणि वाशिममधील एका शेतक-याने गुरुवारी रात्री आत्महत्या केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. आत्महत्येपूर्वी एका शेतक-याने ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करू नका’ असे पत्र लिहिल्याने आणखी खळबळ उडाली आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मासळ येथील गजानन थोरात, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील वडनेर येथील कमलाबाई चव्हाण आणि याच तालुक्यातील कोठोडा गावातील गजानन घोटेकर या तिघांनी वेगवेगळ्या घटनांत गुरुवारी रात्री आत्म्हत्या केली.
हे तिघेही कापूसउत्पादक होते व त्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी सांगितले. गेल्या वर्षी निर्यातबंदीमुळे कापसाच्या किमती अचानक ढासळल्यामुळे कापूस उत्पादकांना झालेल्या नुकसानापोटी दोन हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा राज्य सरकारने डिसेंबर २०११मध्ये केली होती. मात्र, त्याला चार महिने लोटल्यानंतरही मदत मिळाली नाही. त्यातच केंद्र सरकारने पुन्हा निर्यातबंदी लागू केल्याने या शेतक-यांनी आत्महत्या केली, असे तिवारी म्हणाले.
व्यथित शेतकरी कै. गजानन घोटेकर यांच्या मृत्युपूर्व पत्राचा मजकूर:
“माझा ट्रॅक्टर जुना होता. त्याच्यासाठी रिपेरिंगला खूप खर्च आला. माझं खातं थकीत झालं, सोनंनाणं विकलं गेलं. मी कर्जबाजारी झालो, माझं ग्रामिण बँकेचं पीककर्ज थकीत झालं. मी बेजार झाल्याने आत्महत्या करत आहे. माझ्या मुलीचे लग्न मी करू शकलो नाही. माझ्या कुटुंबाला वाचवा. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू नका व माझ्यासारखी स्थिती निर्माण होऊ देऊ नका. ते देशाला बरबाद करतील.”
सूचना: हे वृत्त जाहीरपणे पुनर्प्रकाशित करण्याचे कारण म्हणजे माझ्या वडिलांनीसुद्धा ३ एकर कपाशीची लागवड केली होती. त्यामध्ये त्यांना पहिल्यांदा कपाशीच्या बियाणांमध्ये फसविले त्यामुळे उत्पादन अगदी क्षुल्लक झाले, नंतर सरकारने निर्यात बंदी केली, मग मध्यस्थ टग्यांनी (व्यापारी/अडती) भाव पडून उरल्या मालाची वाताहत केली, आणि जेव्हा सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली तेव्हा अर्ज दाखल करून घेण्यासाठी हेक्टरी २०० रुपये घेतले. आणि नुकसान भरपाई तरी किती तर केवळ एकरी २००० रुपये. आणि कहर म्हणजे अजून पर्यंत कसलीही भरपाई मिळाली नाही.





Dont vote for Congress and NCP, they will ruin our nation « ॥ कृषी देश ॥ said
[...] काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मत… [...]
bhau torsekar said
आपल्या बातमीचा वापर मी पुण्यनगरीत प्रसिद्ध होणार्या माझ्या उलटतपासणी या स्तंभासाठी केला आहे. लौकरच तो लेख प्रसिद्ध होईल. स्तंभातील लेख मी माझ्या ब्लॉगवरही प्रसिद्ध करत असतो. जमल्यास भेट द्यावी. पुन्हा एकदा घोटेकर बातमीसाठी आभार -भाऊ तोरसेकर
( http://bhautorsekar.blogspot.in/ )
संदीप नारायण शेळके said
@भाऊ
आपले कृषीदेश ब्लॉग वर स्वागत आहे.
तुम्ही ह्या ब्लॉग वरील सर्व लेख वापरू शकता, फक्त || कृषीदेश || ब्लॉग कडे वृत्त/बातमी/लेख यांचा स्रोत म्हणून यथायोग्य निर्देश करा अशी विनंती.
जय भारत!
sushant said
great work sir………………………….hats off to you